काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक   

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी परदेशात केलेल्या वक्तव्यानंतर स्वपक्षीय नेत्यांनीच त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 
मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक झाला का? काँग्रेस सरकारच्या म्हणजेच यूपीएच्या १० वर्षांच्या काळात एकही सर्जिकल स्ट्राईक झाला नाही का? असे म्हणत काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळातील सर्जिकल स्ट्राइकची यादीच जाहीर केली आहे.  
 
काँग्रेसने २००८ ते २०१४ या सहा वर्षांत केलेल्या ६ सर्जिकल स्ट्राईकची यादी जाहीर केली आहे. १६ जून २००८ रोजी पूंछमधील भटाल सेक्टर, नीलम नदी खोरे, ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०११ या काळात शारदा सेक्टर आणि ६ जानेवारी २०१३ रोजी सावन पात्रा येथे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. 
 
याशिवाय २७-२८ जुलै २०१३, ६ ऑगस्ट २०१३ आणि १४ जानेवारी २०१४ रोजी काँग्रेस सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राईकचा दावा करण्यात आला आहे. 
आम्ही लष्कराचे श्रेय घेतले नाही
 
पक्षाचे ज्येष्ठ नेते उदित राज म्हणाले, काँग्रेसने पाकिस्तानवर सहा सर्जिकल स्ट्राइक केले. काँग्रेसने सैन्याचे श्रेय कधीही घेतले नाही. सैन्याचे शौर्य आणि धाडस त्यांच्याकडेच राहिले पाहिजे. काँग्रेसला लष्कराचा आदर कसा करायचा हे माहित आहे. सैन्याने उत्कृष्ट ऑपरेशन सिंदूर राबवले, त्यांना सलाम. मात्र, भाजपने लष्कराचा आदर करायला हवा. सैन्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही.

Related Articles